श्री भालचंद्र दत्तात्रय लिमये उर्फ प.पू. सद्गुरू ती. अण्णा तथा परमहंस श्री चैतन्यस्वरूप यांना लहानपणापासून अध्यात्माची ओढ होती व सद्गुरूंच्या शोधात असताना त्यांची गाठ प. पू. श्री रावसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्याशी इ.स. १९५३ मध्ये झाली.
एकदा ती. अण्णांचे गुरू ती. अण्णांना म्हणाले, “अरे, तुला इंग्लंडला जायचे आहे का?” तेव्हा ती. अण्णा म्हणाले, “हो, जायचे आहे!”
त्यावर सद्गुरू रावसाहेब म्हणाले, “अरे, इंग्लंड म्हणजे आपले कोकण. कोकणात जा व कोकणाचे इंग्लंड कर.”
त्याप्रमाणे ती. अण्णांनी डोंबिवली गाव निवडले व प्रपंच करता करता सद्गुरूंचे स्मरण करीत स्वामी समर्थांची उपासना करून गुरूवैभव वाढविले.
त्यांच्या पत्नी सौ. सुषमा लिमये ह्यांनी त्यांना प्रपंच व परमार्थात पूर्ण साथ दिली. ह्याच ती. अण्णांच्या सत्शिष्या.
ती. अण्णांची गुरूपरंपरा खूप मोठी होती. ती. अण्णांचे गुरू श्री. रावसाहेब सहस्त्रबुद्धे, त्यांचे गुरू श्री. बीडकर महाराज व बीडकर महाराजांचे गुरू श्री स्वामी समर्थ महाराज.
ती. अण्णांना रावसाहेबांनी प्रथम गुरूमंत्र दिला. नंतर श्री स्वामी समर्थांकडून त्या मंत्रावर दिव्यशक्तींचा ओघ येऊन तो आणखीन तेजोमय केला गेला.
ती. अण्णांनी गुरूआज्ञेचे तंतोतंत पालन केले व डोंबिवलीत आणि इतर ठिकाणी समाजाला सुसंस्कारित केले.
अहोरात्र एकच ध्यास ह्या दांपत्याचा होता, तो म्हणजे उपासकांना व गरजूंना मार्गदर्शन करून त्यांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवायचा.
हे गुरूवैभव चिरकाल रहावे व सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ह्या हेतूने ती. अण्णा व ती. सौ. आईनी श्री स्वामींचा मठ बांधण्याचे ठरविले.
त्यावर श्री स्वामी समर्थांनी स्वप्नात येऊन मठाचा आराखडाही सांगितला.
त्याप्रमाणे ३ डिसेंबर १९९८ रोजी मठवास्तुचे उद्घाटन व कळसपूजन हे कार्यक्रम सुंदर रीतीने संपन्न झाले.
त्यानंतर ११ डिसेंबर २००१ रोजी ती. अण्णांचा ७१ वा वाढदिवस मठामध्ये सर्व भक्तांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला.
त्यावेळी ती. अण्णांना मूळ पादुका प्रदान करणारे गुरूवर्य प.पू. नाना परांजपे ह्यांच्या हस्ते ती. अण्णांना मानपत्र देण्यात आले.
तसेच “चैतन्याचा नाथपंथी” ह्या ती. अण्णांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन प.पू. ती. नाना परांजपे ह्यांच्या हस्ते झाले.
ती. अण्णांच्या सत्शिष्या ती. सौ. आई तथा श्री लक्ष्मीस्वरूप ह्यांनी ती. अण्णांच्या आज्ञेने लिहिलेले आत्मचरित्र “माझी ओळख” ह्याचे प्रकाशन डॉ. अरूणाताई ढेरे यांच्या हस्ते झाले.
एकाच दिवशी हा महान मंगल सोहळा पार पडला.
त्यावेळी ती. सौ. आई व प.पू. ती. अण्णा यांनी अत्यंत मोकळेपणाने “मठवास्तू झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले” असे सांगितले आणि पुढील जीवनात भक्तांसाठी एक उपासनेचे स्थान निर्माण करून ठेवले.
गुरूस्थानी असलेल्या ह्या विभूतीला आपण डोळ्यांनी बघावे ही सर्वांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ह्या “लिंक” द्वारे त्यांनी त्या प्रसंगी मांडलेले विचार व त्यांचे व्यक्तीशः दर्शन आम्ही पुढील चित्रफितीत देत आहोत.